दरवर्षी राज्यात मोठ्या प्रमाणात उसाचे उत्पादन घेतले जाते. परंतु यावर्षी उसाचे उत्पादन घटले आहे. याला कारण आहे पाऊस. यावर्षी राज्यात पाऊस पुरेशा प्रमाणात झाला नाही. त्याचा फटका उसाला झाला आहे. अशातच सर्वांचे लक्ष गळीत हंगामाकडे लागले होते. 1 नोव्हेंबर पासून ऊसाचा गळीत हंगाम सुरु केला आहे.
मागील काही दिवसांपासून ऊसदरावरून (Sugarcane Price) आंदोलन पेटले आहे. अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकरी आणि शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. दरम्यान, मागील दीड महिन्यांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ऊसदर आणि मागील हंगामातील गाळप झालेल्या उसाचे एकूण ४०० रुपये शेतकऱ्यांना मिळण्यासाठी आंदोलन सुरू आहे. अशातच एका श्रीगोंद्यातील कारखान्याने इतर कारखान्यांचे टेन्शन वाढवले आहे.
सध्या नगर जिल्ह्यात उसाबरोबर दूध दरवाढीवरून (Shrigonda Gauri Sakhar Karkhana) वातावरण चांगलेच तापले आहे. अशातच आता श्रीगोंद्यातील हिरडगाव येथील गौरी साखर कारखान्याने शेतकऱ्यांचे तोंड गोड केले आहे. या कारखान्याने पहिला हप्ता 3 हजार 106 रुपये इतका दिला आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे. परंतु इतर कारखान्याकडून शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.
दरम्यान, हा कारखाना भाजप आमदार बबनराव पाचुपते यांनी सुरू केला होता. परंतु, कालांतराने हा कारखाना त्यांच्या काळात अडचणींत आला होता. सध्या हा कारखाना बाबूराव बोत्रे या उद्योगपतींनी घेतला आहे. उसाचे भाव तीन हजार रुपयांच्या पुढे दिल्याने साहजिकच जिल्ह्यातील स्थानिक नागवडे आणि कुकडी कारखान्यांकडून शेतकरी आणि सभासदांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. नागवडेने 2 हजार 500 रुपये आणि कुकडीने 2 हजार 600 रुपयांची पहिली उचल दिली आहे.
महत्त्वाचे म्हणजे हे दोन्ही कारखाने शेतकऱ्यांच्या मालकीचे आहेत. शेतकरी आणि सभासदांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. सध्या हा कारखाना श्रीगोंद्यासोबत नगर जिल्ह्यातील इतर साखर कारखान्यांना आव्हान देणारा ठरला आहे. एकंदरीतच जर इतर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अपेक्षित दर दिला नाही तर वातावरण आणखी पेटू शकते.



0 Comments