मुंबई / गीता संघर्ष ऑनलाईन डेस्क :
महाराष्ट्रात आजपासून पुन्हा एकदा देवेंद्र पर्व सुरु झाले. मुंबईतील आझाद मैदानावर आयोजित केलेल्या सोहळ्यात देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि.५) तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. ते आता राज्याचे २१ वे मुख्यमंत्री बनले आहेत. तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदी शपथ घेतली. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शपथविधी सोहळा पार पडला. विशेष म्हणजे ६५ वर्षीय अजित पवार यांनी आज सहाव्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यामुळे राज्यात सर्वाधिक सहावेळा उपमुख्यमंत्री झालेले ते पहिले नेते ठरले आहेत.
अजित पवार पहिल्यांदा १९९१ मध्ये पहिल्यांदा महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले होते. अजित पवार बारामती मतदारसंघाचे १९९१ पासून प्रतिनिधित्व करीत आहेत. सलग आठ वेळा ते बारामतीतून निवडून गेले आहेत. अजित पवार नोव्हेंबर २०१० ते सप्टेंबर २०१२, ऑक्टोबर २०१२ ते सप्टेंबर २०१४, २३ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर २०१९ (पहाटेचा शपथविधी), डिसेंबर २०१९ ते जून २०२२, जुलै २०२३ ते नोव्हेंबर २०२४ या काळात अजित पवार उपमुख्यमंत्रीपदी राहिले. आज गुरुवार ५ डिसेंबर २०२४ रोजी त्यांनी सहाव्यांदा उपमुख्यमंत्रीपदी शपथ घेतली.



0 Comments